रत्नागिरी : ‘विद्यार्थिदशा करिअर घडवणारी असून, नियमित व्यायाम, योगासने, योग्य वेळी नाश्ता, जेवण ही एक साखळी आहे. यातील कोणतीही गोष्ट अवेळी केल्याने प्रश्न उभे राहतात. त्यामुळे शिस्तीने वागावे, संगीत ऐकावे. त्यातून आपल्या क्षमतांचा विकास होतो. नर्सिंग कौशल्याद्वारे आपण देशाच्या विकासात योगदान द्यावे,’ असे आवाहन रत्नागिरीतील ‘दी यश फाउंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंग अँड एमआरआय’चे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी केले.
बीएस्सी नर्सिंगच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात ते बोलत होते. नर्सिंग कॉलेजमध्ये भविष्यात वसतिगृह, हायजिनिक फूड, योगा, व्यायाम या सुविधाही देण्याचा मानस आणि नर्सिंगचे सर्व अभ्यासक्रम शिकवण्याचा संकल्प माने यांनी या वेळी व्यक्त केला.
ते म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदीसह आणखीही भाषा शिकल्या पाहिजेत. आपले नर्सिंगचे क्षेत्र माणसाच्या जीवन-मरणाशी संबंध असलेले आहे. सकारात्मक वृत्ती, आत्मविश्वास, रुग्णाच्या नातेवाइकांना दिलासा देणारे संभाषणकौशल्य हवे. हे असे क्षेत्र आहे, की शिक्षण झाल्यावर तत्काळ नोकरी मिळते. हा एकप्रकारे भविष्यनिर्वाहाचा अभ्यासक्रम आहे. देशात नर्सिंगला मोठे महत्त्व आहे. टेक्नोसॅव्ही व्हायला हवे. वैद्यकीय क्षेत्रात नवनवीन उपकरणे येत आहेत. बेसिक, अॅडव्हान्स शिक्षणासह टेलिमेडिसीनच्या माध्यमातून जग जवळ आले आहे. विद्यार्थ्यांनी मानसिकदृष्ट्या सक्षम व्हावे. आपल्या कामावर कोणत्याही कारणाचा विपरीत परिणाम होता कामा नये. रुग्णाच्या नातेवाइकांना आपण आश्वस्त केले पाहिजे.’
रजिस्ट्रार शलाका लाड यांनी सांगितले, ‘माने यांच्यामुळेच नर्सिंगचे शिक्षण येथे बऱ्याच विद्यार्थ्यांना घेता येऊ लागले. या शैक्षणिक संधीचे विद्यार्थ्यांनी सोने करावे. इमारत होण्यापूर्वी पाच खोल्यांमध्ये कामकाज चालायचे. १४ वर्षांत सुमारे हजार विद्यार्थी शिकले.’
या वेळी सर्व नवीन शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नृत्य, गीतगायन, स्किटचे सादरीकरण केले. तसेच चतुर्थ वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नव्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन स्वागत केले.